Monday, July 31, 2017

दुरून डोंगर साजरे

२२/०४/२०१४ एका शेतामध्ये एक अतिशय सुंदर झाड होत. पाना-फुलांनी बहरलेलं, मधुर फळांनी लगडलेल. येणाजानार्या वाटसरूच अगदी मन प्रफुल्लीत व्हायचं त्या झाडाला पाहून. सगळ काही गुण्यागोविंदाने चाललेलं असताना अचानक एके दिवशी झाडाच्या मुळांनी कुरबुर सुरू केली. वार्याच्या झोक्याबरोबर आनंदाने डोलणाऱ्या पाना-फुलांकडे पाहून मुळे उद्गारली, "तुमच बर आहे राव. स्वच्छ मोकळी हवा, सूर्यप्रकाशाचा आनंद तुम्हाला रोज मिळतोय. वरून येनाजाणारे लोक तुमची स्तुती करतायत ते वेगळंच. आम्ही मात्र कमनशीबी, आयुष्यभर मातीत तोंड खुपसून तुमच्यासाठी अन्नाची व्यवस्था करायची आणि शेवटी त्याच मातीत संपून जायचं." मग काय पानांनीही प्रत्युत्तर दिलं, "आम्हीही तुमच्यासाठी कडक उन सोसून तुम्ही मिळवलेल्या द्रव्याचं रुपांतर अन्नात करतो." फळा-फुलांनी हि मग वादात उडी घेतली, "अरे आम्हा दोघांना मिळवण्याच्या लालसेमुळे मनुष्य तुम्हाला रोज पाणी देतो. नाहीतर पाण्याविना तडफडत तुम्ही कधीच मेला असता." वाद अगदी टोकाला पोहोचला होता. त्याचवेळी बाजूने जाणार्या एका माणसाने हा वाद ऐकला. हा वाद अनाठाई आहे हे त्याला कळत होत. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत. त्यामुळे त्याने त्या सर्वांना एक पर्याय सूचवला. सर्वांनी आळीपाळीने आपल्या भूमिका, काम बदलाव, जेणेकरून एकमेकांच्या सुख- दुख: ची जाणीव होइल. सर्वांच यावर एकमत झालं. ठरल्याप्रमाणे त्या मध्यस्ताच्या सहाय्याने पाना-फुलांनी व फळांनी मुळांची जागा घेतली, तर मुळांनी पाना-फुलांची जागा घेतली. काही वेळ सर्वजण आपल्या नव्या भूमिकेत खुश होते. एवढ्यात उन्हं चढायला लागली, तशी मुळांची उन्हामुळे तलकली व्हायला लागली. तिकडे पाना-फुलांचीही हवा व सुर्याप्रकाशाशिवाय मातीमध्ये घुसमट व्हायला लागली. थोड्याच वेळात त्यांना आपली चूक उमगली. सर्वांनी मध्यस्थाला विनंती केली व आपल्या मूळ भूमिकेत परत आले. ========================================================== समाजात किंवा संसारी जगात वावरताना बर्याच वेळा हा अनुभव आपल्याला येतो. प्रत्येकजण आपलंच काम कस महत्वाच आणि उच्च आहे हे पटवून देत असतो. खर तर कोणाचही काम कमी अधिक महत्वाच किंवा उच्च नीच नसत. सर्वांची कामं, भूमिका ह्या एकमेकाला पूरक असतात. पण हे समजण्यासाठी मानसाच उभं आयुष्य खर्ची पडतं. जेवढ्या लवकर आपण हे समजून घेऊ, तेवढ्या लवकर आपण सुखाच्या दिशेने मार्गक्रमण करु. ========================================================== ता. क :- मूळ कथा कधी, कोठे वाचली, कोणी लिहिलीय वगैरे आठवत नाहीं. पण ज्या कोणी लिहिली असेल त्यांस सलाम.

No comments:

Post a Comment