दरवर्षी (वर्षानुवर्षे) मुंबईत तुफान पाऊस पडतो. ठराविक सखल भागात पाणी भरतं. नागरिकांचे संसार रस्त्यावर येतात. मुंबईत येऊन मला १९ वर्षे झालीत. पूर्वी मी राहत असलेला डिलाईल रोड, लोअर परेल असेल किंवा काम करत असलेला पश्चिम उपनगरांचा भाग असेल, काही ठिकाणी नित्यनेमाने पाणी भरत असतं. रस्ते खराब होत असतात. वाहतुकीची कोंडी होत असते. दरवेळी महापालिका तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करत असते आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असतो. आधी संपूर्ण मुंबईतले रस्ते हे महापालिकेच्या ताब्यात होते. ८-१० वर्षापूर्वी यातला काही भाग एमएमआरडीएकडे सोपवण्यात आला होता. दोन्ही संस्थांनी मिळून यथेच्छ गोंधळ घालून ठेवलेला आहे. याचे परिणाम सामान्य नागरिकास भोगावे लागतात. महापालिका किंवा एमएमआरडीए ने अजिबात काम केलेलं नाही असंही नाही. पण दोघांना मिळणारा निधी पाहिला तर एव्हाना मुंबईचं शांघाय व्हायला हरकत नव्हती, हे शेंबड पोर देखील सांगेल. मग नेमका विकास का नाही झाला? कालपर्यंत चाळीत राहणारा (कोणत्याही पक्षाचा) कार्यकर्ता नगरसेवक झाला की पाच वर्षात त्याच्या बुडाखाली फॉर्च्युनर येते नी तो चाळीतून किमान २-३-४ बीएचके च्या घरात शिफ्ट होतो. रस्ते विभागात चिकटलेला नुकतंच मिसरुट फुटलेला अभियंता दोन किमी रस्ता बांधला की चार चाकीतून उडायला लागतो. वरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर न बोललेलं बरं. मालिशकाने नेमकं "त्या" गाण्यातून वर्मावर बोट ठेवलं तर साऱ्यांची पंचायत झाली. परवा एका नगरसेविकेने सांगितलं की हे गाणं म्हणजे तमाम मुंबई आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कसं काय बुवा? खड्ड्यात आयुष्य गेलेल्या मुंबईकराला कधी टेबलाखालच्या पाकिटाचा वास तरी दिलात का? अंगावर आलं की मराठी माणसाची ढाल पुढे करणार का? त्यापेक्षा "येत्या मोसमात माझ्या प्रभागात कुठेही पाणी भरणार नाही अशी व्यवस्था निर्माण करेन" अशी शपथ घेतली असती तर मतदारांचं भलं नसतं का झालं? हद्द म्हणजे त्या गाण्यासाठी म्हणे मालिशकावर ५०० कोटींचा अब्रूनुकसानभरपाईचा दावा ठोकणार. कोणाची अब्रू? आणि कुठे असते ती? भरा खटला, जिंका आणि ते पैसे तरी कारणी लावा. अजून काय बोलणार! -- हतबल माजी नागरिक - बृमुंमपा
No comments:
Post a Comment