Monday, July 31, 2017
निवड स्वातंत्र्य
आपले आई वडील कमी शिक्षित असल्यानेच आपल्याला आपल्या आवडीचं करिअर विना दबाव निवडता आलं, असं विश्वास नांगरे पाटील बऱ्याचदा भाषणात सांगतात. (व्हिडीओ आहे बरका 😬) माझ्या बाबतीत सुद्धा योगायोगाने हे खरं आहे.
दहावी नंतर बारावी सायन्स आणि पुन्हा डिग्रीचा खर्च झेपायचा नाही म्हणून शॉर्टकटने (अर्धवट) का होईना इंजिनीरिंग करायचं म्हणून डिप्लोमाला (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग) गेलो. कर्म धर्म संयोगाने डिस्टिंक्शन मध्ये पास सुद्धा झालो. पोरगं काय करतंय असं कोणी विचारलंच तर 'वायरमनचा कोर्स केलाय' असं आमच्या मातोश्री (अभिमानाने) सांगून टाकायच्या. हे ऐकताना मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. 'याचसाठी केला होता (का) हा अट्टाहास?' असं ओरडून विचारावंसं वाटायचं.
पुढे लगेचच मुंबईला बीएसईएस'मध्ये सबइंजिनिअर म्हणून रुजू झालो. तरीही मातोश्रींचं भाबडेपण काही कमी झालं नव्हतं. "बाळा, डांबावर (इलेक्ट्रिक पोल) जपून चढत - उतरत जा रं बाबा" असं काळजीपोटी म्हणायची तेव्हा खरंच त्या डांबावर चढून खाली उडी मारावी असं वाटायचं.
आमचे आई-बाप कमी शिक्षित, भाबडे असले तरी अडाणी नव्हते... दुराग्रही तर अजिबात नव्हते. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी माझ्यावर न लादता माझ्या बकुबाप्रमाणे शिकून (जमेल तितकं) मोठं व्हायचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं.
माझ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा मी हेच ठरवलंय.
(निकालाच्या भीतीने घर सोडणाऱ्या, आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या तमाम अभागी मुलामुलींच्या आदरणीय मातापित्यांस समर्पित)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment