***** इतिहास, पुराण आणि मी ***** मुळात पाठांतर हा माझा पिंड नव्हे. बहुदा इनबिल्ट अभियांत्रिकी मेंदू, त्यामुळे एखादी कन्सेप्ट खोलात जाऊन समजावून घ्यायची म्हणजे विसरण्याचा प्रश्नच नाही. हा सिम्पल फंडा. *** हे अवांतर यासाठी की थोडी स्वतःच स्वतःची पाठ खाजवून घेतल्याशिवाय पोस्टला वजन येत नाही म्हणून *** तर मूळ मुद्दा असा की आम्ही शाळेत असताना आमचे इतिहासाचे शिक्षक (नीट नाव सुदधा आठवत नाही) हे काही इतिहासप्रेमी म्हणून विषय शिकवत नव्हते, तर अंगावर टाकलेली जबाबदारी (पक्षी पाटी असे वाचावे) वाहण्याचं काम करत होते. वर्गात घुसल्या घुसल्या स्वतः पुस्तक उघडणे (मग आम्हीही उघडणे हे योगाने आलंच) आणि सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजींना लाज येईल एवढ्या वेगाने वाचून धडा 'संपवणे' यालाच ते आपलं इतिकर्तव्य माणणाऱ्यातले होते. त्यातून इतिहासातल्या सणसणावळ्या म्हणजे माझ्या कट्टर शत्रू. कितीही घोकंपट्टी केली तरी मेल्या मला काही पावायच्या नाहीत. मग जे जमत नाही, आवडत नाही ते ऑपशनला टाकणं हे ही ओघाने आलंच. पण म्हणून मला इतिहास आवडत नव्हता असं नाही. इतिहासातील प्रत्येक पात्र वाचताना जणू ते अंगात शिरल्याचा भास व्हायचा. सगळंच भव्य दिव्य. बिळाशीच्या मराठी शाळेत चौथी - पाचवीत असताना आम्हाला शाळेत पडद्यावर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बालशिवाजी चित्रपट दाखवण्यात आला होता. पुढे पाटील गल्लीतली आमची झुंड कित्येक दिवस चिनीदांडू आणि गोट्या बाजूला ठेऊन गारवेलच्या छपाट्या तलवारी सारख्या वापरून राजांचा गनिमी कावा आणि लढाया खेळण्यात गुंग झाली होती. 'थोरांचा इतिहास' अभ्यासताना त्या थोरांची जात प्रथम पाहण्याचा नतद्रस्टपणा तेव्हा समाजात भिनलेला नव्हता. त्यामुळे शाहू महाराज हे कल्याणकारी राजा म्हणूनच लक्षात राहिले. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई हे शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच लक्षात राहिले. लोकमान्य म्हटलं की त्यांचा बाणेदारपणाच आठवतो. सावरकर म्हटलं की जाज्वल्य देशप्रेम आणि बाबासाहेब म्हटलं की त्यांची विद्वत्ताच आकर्षित करते. आपला समृद्ध इतिहास आणि पुराण ही आता काही लोकांसाठी रोजीरोटीचं साधनमात्र राहिलेल्या आहेत. ती रोजीरोटी टिकून राहावी आणि पर्यायाने पुढच्या पिढ्यांची सोय लावता यावी यासाठी रोज नवा इतिहास जन्माला घातला जातोय आणि जाईल. आताची कोवळी पिढी मात्र ह्याचं खरं की त्याचं खरं या दुविधेत एक दिवस इतिहास विषय कायमचा ऑपशनला टाकील आणि तो दिवस सगळ्यात दुर्दैवी म्हणून गणला जाईल. आदरणीय राजीव साने सरांनी आज एक अतिशय छान पोस्ट लिहिलीय, "भूतकाळ बदलत नाही पण त्याचा अर्थ बदलतो म्हणून इतिहासकारांना वाटते आपणच तो घडवतो" नव्या पिढीने यातला गर्भित अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जुने इतिहासकार आणि नवे उदयोन्मुख इतिहासकार यांच्या वादात एकदिवस आपण एकमेकांपासून एवढे दूर जाऊ की आपल्या प्रत्येक घराभोवती सुरक्षेसाठी तटबंदी उभारावी लागेल. शैलेंद्र दिंडे २२/०६/२०१७
No comments:
Post a Comment