Monday, July 31, 2017

तिसरी बाजू

"या तो तुम मेरे साथ हो, या फिर मेरे खिलाफ" असले डायलॉग फक्त पिच्चर मध्ये ठीक आहेत. प्रत्यक्ष जीवनात मनुष्य तिसऱ्या बाजूचा सुद्धा असू शकतो. हे मान्य केलं की चर्चा निकोप होते. अन्यथा "माझीच लाल" हा स्टँड आणि निकालपत्र हातात घेऊन केलेली चर्चा निव्वळ घर्षण निर्माण करण्यापलीकडे काहीही कामाची नाही ... नसते. संविधानातल्या कुठल्याशा कलमाला धरून सरकारने गोवंश हत्या बंदी केली असेल (असं इथंच कुणाच्यातरी भिंतीवर वाचलंय) आणि ती चुकीची आहे हे आपलं मत असेल तर ते कायद्याच्या मार्गाने सिद्ध करून सरकारला तोंडावर पाडता येईल. पण तो मार्ग न स्विकारता ऑन कॅमेरा गाय कापून निषेध करणे ह्याला कसलं स्वातंत्र्य म्हणायचं? खरंतर सरकारने लोकांच्या खानपान विषयी भानगडीत न पडता फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं हे बहुतांश समर्थकांना वाटतं. गोहत्तेवरून गोरक्षकांनी चालवलेला धुमाकूळ याविषयी सुद्धा बहुतांश सरकार समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. पण त्या सर्वांना एकदा भक्त कटेगरीत ढकललं की आपण बुद्धिवादी असण्यावर शिक्कामोर्तब होतं असा गैरसमज अलीकडे दृढ होत चाललेला आहे. त्यातून बाहेर पडा राजे हो. बरं मोदी पंप्र पदासाठी लायक नाहीत असं तुमचं म्हणणं असेल तर ते ही मान्य ... पण किमान आत्ताच्या घडीला लायक पर्याय तरी दाखवा किंवा उभा करा. येत्या दोन वर्षात अपेक्षित बदल नाही घडले तर आम्हाला सुद्धा पर्याय हवाच आहे. कारण कोंबडा माझा अरवू दे किंवा तुमचा ... आम्हाला सूर्य उगवण्याशी मतलब आहे. सरकारच्या धोरणांमध्ये असणारा गोंधळ वस्तुनिष्ठपणे मांडलात तर लोक ऐकतील सुद्धा. पण तीच टिका व्यक्ती केंद्रित झाली तर संघर्ष होत राहणार. त्याला आपल्या बुद्धीने मुद्देसूद उत्तर द्यायची तयारी आहे का? विचार करा.

No comments:

Post a Comment