Monday, July 31, 2017

मोहन ...

"मोहन . . . . " नेहमीप्रमाणे खाली मान घालून ऑफिस च्या गेटमध्ये घुसत असतानाच त्याच्या कानावर हाक आली. आवाजही ओळखीचाच होता, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. हो, ती आशु होती. दहा बारा वर्षांपूर्वी तो ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहात होता, त्या घर मालकाची एकुलती एक लेक. दिसायला तशी सावळीच, पण नाकी डोळी नीटस, उंचीपुरी आणि कमालीच्या आत्मविश्वासाने भरलेली. खरतर आत्मविश्वास हेच तीच सौंदर्य होत. जन्मताच आईची साथ सुटलेली. त्यामुळे सावत्र आईच्या हाताखाली राबता राबता उर्वरित वेळात अभ्यास करून शिकावं, मोठ्ठ व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. म्हणतात ना 'संकट त्याच्याच वाट्याला येतात त्याच्यात ती झेलायची क्षमता असते', काहीस असंच तिचं आयुष्य होतं. बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला असतानाच किरकोळ तापाचं निमित्त झालं आणि वडील गेले. सावत्र आई आणि दोन सावत्र भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली . . . खरतर तसं नातेवाईकांनीच तिच्या गळी उतरवलं. तिनेही न डगमगता ती जबाबदारी स्वीकारली, मात्र एका अटीवर - शिक्षण अर्धवट न सोडण्याच्या. एका छोट्याश्या घटनेने तीच आयुष्य आमूलाग्र बदललं. वडील गेल्यानंतर सावत्र आईने अंथरून धरलं. दोन भावंडं अनुक्रमे १० आणि १३ वर्षांची, पण जबाबदारी आणि परिस्थितीची कोणतीही जाणीव नसलेली. त्यामुळे रोज सकाळी चारच्या ठोक्याला तिचा दिवस सुरू व्हायचा. आंघोळपाणी उरकायचं, तिघांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, स्वतःसाठी डबा घायचा आणि सहा वाजता कॉलेजला जाण्यासाठी घर सोडायचं. दुपारी दोन ला घरी यायचं. भांडी - कुंडी, धुणी उरकायची, मग सहा पर्यंत स्वतःचा अभ्यास आणि पुन्हा स्वयंपाक करता करता १० - १५ पोरांची शिकवणी घ्यायची. सगळं उरकता उरकता झोपायला रोजचे ११ वाजायचे. या सगळ्या धबडग्यात तीच स्वतःकडे अक्षम्य दुर्लक्ष व्हायला लागलं. परिणाम चेहऱ्यावर दिसायला लागले. एका बाजूला वय वाढत चालल्याची जाणीव आणि दुसरीकडे जबाबदारीचं ओझं; पुरती पिचून गेली होती बिचारी. मोहन नुकताच एका बड्या उद्योगसमूहात बड्या हुद्यावर रुजू झाला होता. आशूच्या धडपडीचं त्याला मोठ्ठ कौतुक वाटायचं. पण दोघांच्याही व्यस्त वेळापत्रकामुळे कधी फारसं बोलणं - भेटणं व्हायचं नाही. चुकून एखाद्या रविवारी संध्याकाळी थोडी संधी मिळाली की ती न चुकता त्याच्या घरात जायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. हळूहळू मैत्री घट्ट होत गेली. मोहन वेळप्रसंगी तिला मदतीचा हात द्यायचा. ती ही न चुकता वेळेत परत फेड करायची. आशु मोहनच्या दिलदारपणामुळे त्याच्याकडे आकृष्ठ होत होती. तो मात्र तिच्याकडे फक्त एक रोल मॉडेल आणि चांगली मैत्रीण म्हणून पाहायचा. दरम्यान तिने बी कॉम पूर्ण केलं आणि एका सी. ए. च्या कार्यालयात ती नोकरी करू लागली. काही दिवसानंतर तिच्या त्याच्याविषयीच्या भावना त्याला लक्षात यायला लागल्या. तसा तो सावध झाला. तो स्वतः कठीण परिस्थितीतून वर आला होता. "आंतरजातीय" वगैरे लफड्यात पडून कुटुंबाची विनाकारण वाताहत होईल ही भीती कायम त्याच्या मनात होती. थोड्याच दिवसात मोहनने स्वतःचं घर खरेदी केलं आणि त्यानं आशुचा निरोप घेतला. त्यापासून १२ वर्षात एखाद दुसरा प्रसंग वगळता त्याला कधीही आशूची आठवण झाली नाही, तसं काही कारणही नव्हतं आठवण होण्याचं. आज तिला असं अचानक पाहून क्षणार्धात सर्व पट त्याच्या डोळ्यासमोर आला. एकमेकांना एवढ्या वर्षांनी भेटून दोघांनाही अतिशय आनंद झाला. थोडीफार इकडची तिकडची चौकशी झाली. मात्र वेळेअभावी दोघांना फार वेळ बोलता आलं नाही. मग एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण झाली आणि दोघीनींही निरोप घेतला. दिवसभराचं काम संपवून मोहन घरी पोहोचला होता. रात्री अकराच्या आसपास त्याचा मोबाईल खणखणला. अर्थातच, आशुचा फोन होता. थोड्याफार गप्पा झाल्या आणि मग तिने थेट दुसऱ्या दिवशी तिच्या नवीन घरी भेटण्याचं त्याला आमंत्रण दिलं. आमंत्रण कसलं . . . आगह केला. उरात थोडीफार धाकधूक होती, तरीही मोहन तयार झाला. सकाळी निघतानाच त्याने बायकोला रात्री यायला उशीर होईल असं सांगून ठेवलं. ठरल्याप्रमाणे तो संध्याकाळी सात वाजता आशूच्या घरी पोहोचला. ती एकटीच होती. चहा नाश्ता होता होता गप्पा रंगल्या. दरम्यान ती अजूनही अविवाहित असल्याचं त्याला समजलं. . . . अर्थातच त्याच्या प्रतीक्षेत. तिची आई देवाघरी पोहोचली होती आणि दोन्ही भाऊ कुठल्याशा गुन्ह्यात जेलमध्ये. तिच्या वाट्याला उरलं होतं फक्त एकाकी जीवन. मोहनच्या पुन्हा भेटण्याने आशूच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. वाढत्या वयाबरोबरच तिला आधाराची गरज वाटू लागली होती. एकट्या बाईच्या नशिबी जेवढे भोग येतात ते भोगल्यामुळे तिचा कोणाही पुरुषावर विश्वास उरला नव्हता . . . अपवाद होता मोहनचा. पण मोहन स्वतः विवाहित आणि एका लेकराचं बाप होता. त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी त्याच्या संसारात विष कालवण्याएवढी ती निष्ठुर किंवा मतलबी नव्हती. पण तिच्या डोक्यात एक वेगळाच विचार मोहन भेटल्यापासून सुरू झाला होता. तिला आता थांबायचं नव्हतं. "मोहन, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय." थोडं गंभीर होत आशु म्हणाली. "बोल ना." थोडं सावध होत तो बोलला. "गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला जे वाटतंय ते तुझ्याशिवाय मी कोणाला सांगू?" "बोल ग, अगदी बिनधास्त बोल." क्षणाचाही विलंब न करता ती उद्गारली, "मला जगण्यासाठी आधार देशील?" तीच वाक्य ऐकून तो हादरलाच होता. पण तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला, "म्हणजे?" "एक मूल टाकशील माझ्या पदरात?" कानात कोणीतरी गरम शिसं ओतल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोरून जीव ओवाळून टाकणारी पत्नी आणि निष्पाप मुलाचा चेहरा तरळून गेला. काहीही बोलायला त्याला शब्द सुचत नव्हते. त्याला तिचा राग आला नव्हता. पण तिच्या असहाय्य्यतेची दया मात्र येत होती. हतबल होऊन तो सोफ्यावरून उठला आणि दरवाजा उघडून तडक घरी गेला. आशु मात्र शून्यात नजर लावून तिथेच बराच वेळ बसून राहिली. आज मोहनचं कशातही लक्ष लागत नव्हतं. बाहेर जेवून आल्याचं निमित्त सांगून तो सरळ झोपायला गेला. मात्र उशिरापर्यंत त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. विचार करून करून मेंदू थकला आणि मग पहाटे कधीतरी तो झोपी गेला. सकाळी आठला त्याच्या बायकोने त्याला हलवून जागा केला आणि हातात बेड टी चा कप देऊन ती निघून गेली. चहाचा घोट घेत घेत त्याने रिमोटने टी.व्ही. चालू करून आपला फेव्हरेट न्यूज चॅनेल ट्यून केला. टी.व्ही. च्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूज ची पट्टी झळकत होती --- "आश्लेषा सोनावणे नावाच्या महिलेचा तारांगण इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू!" मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. चहाच्या कपासहित तो तिथेच थिजून गेला. @शैलेंद्र दिंडे. २३/०७/२०१६

No comments:

Post a Comment