Monday, July 31, 2017

मराठा मूक मोर्च्यांच्या निमित्ताने ...

मराठा मूकमोर्च्याच्या निमित्ताने ... मराठा समाजाच्या समस्यांचं मुळ आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये आहे असं माझं ठाम मत आहे. बहुतांश काळ आमचे नेते सत्तेत असुनही त्याचा फायदा एकगठ्ठा मतदान करणाऱ्या सामान्य मराठ्यापर्यंत फारसा पोहोचलेला नाही हीच बाब मोर्च्याला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादातुन समोर येत आहे. नेत्यांच्या करोडो - अब्जोंच्या उड्डानांचा राग मात्र अजुन कुठे व्यक्त होताना दिसत नाही. दुसरीकडे उपलब्ध आकडेवारी बघितली तर अट्रो्सिटीचा आणि आमच्या आर्थिक दृष्ट्या मागास राहण्याचा काडीचा संबंध नाही हे स्पष्ट दिसतय. अट्रो्सिटीची दहशत मात्र गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण पुन्हा या कायद्याचा वापर (सर्वपक्षीय) नेत्यांनीच एकमेकाला संपवायला केल्याचं दिसेल. आमची खरी दुखरी नस म्हणजे बेभरवशाचा शेती उद्योग आणि उच्च शिक्षण घेताना होणारी कोंडी. व्यापारी तत्वाचा अभाव आणि तोट्यात गेली तरी परंपरा म्हणून शेती कसलीच पाहिजे हा अट्टाहास आमच्या मुळावर उठलाय. कुटुंबात दोन मुलगे असतील तर एक नोकरीत पण दूसरा शेतीतच खपला पाहिजे हा समज आजही बहुतांश ठिकाणी दृढ़ आहे. यातून नोकरीवाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतानाच बेभरवशाची शेती पाय मागे ओढायला सतत टपुन बसलेली असते. शेवटी बेरीज शून्य. आमच्या समाजातील नेत्यांना शेतीपुरक तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभे करून शेती आणि रोजगाराचा प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवणं सहज शक्य होतं. काही सन्माननिय अपवाद वगळता हे काम पुरेशा प्रमाणात झालच नाही. काही नेते मात्र एक्स्ट्रा स्मार्ट निघाले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून लालुच देऊन सामान्य शेतकर्याकडून पैसा जमा केला आणि सत्तासोपानाचा वापर करून स्वत:च्या वतनदाऱ्या निर्माण केल्या. सामान्य जनता मात्र शोषनाच्या दुष्ट चक्रात तशीच अडकून पडलेली आहे. यातून बाहेर पडून शिक्षण घ्यायला जावं तर तिथेही निराशाच पदरी पड़तेय. नादारीच्या भरवश्यावर पोरं कसंतरी दहावी - बारावीपर्यंत पोहोचल्यावर पुढे उच्च शिक्षण घेउन कुटुंबाचा उद्धार करण्याची ते स्वप्नं पाहू लागताच तिथं व्यवस्था आड़ येतेय. आरक्षित आणि खुल्या वर्गातल्या शुल्कातला अवाढव्य फरक पाहून त्याच्या डोक्यात पहिली ठिणगी पड़ते. गुणवत्ता असुनही डावललं गेल्याचं शल्य तो कधीच विसरु शकत नाही. स्वत:च्या फायद्यासाठी कायदे बनवणाऱ्या आणि अस्तित्वात असणारे कायदे हवे तसे वाकवणाऱ्या आमच्या xyz सम्राट नेत्यांना "आपल्या" मतदार वर्गाला दिलासा देणं इथं सहज शक्य असलं तरी ते असं करत नाहित. कारण त्यांचा मैनेजमेंट कोटा फ़क्त स्वत:च पोट भरण्यासाठी असतो. सध्याचे मराठा समाजाचे मोर्चे स्वत:च्या उद्धारासाठी आहेत की कोणाच्या निर्दालनासाठी, आरक्षण मिळणार किंवा नाही - मिळाल्यास ते कोर्टात टिकणार की नाही, अट्रो्सिटीत बदल होणार की रद्द होणार हे सर्व चर्चेचे मुद्दे होऊ शकतात आणि तशी चर्चा व्हायला हवी. पण या आडून काही लोकांची जी शेरेबाजी सुरु आहे ती फ़क्त निंदनीय आहे. अगदी न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या शिस्तीने निघणारे लाखोंचे मोर्चे ही खरोखरच प्रशंसनीय बाब आहे. त्यावर विकृत शेरेबाजी करून आपले खरे संस्कार कृपया बाहेर काढु नयेत ही माफक अपेक्षा आहे. मी स्वत: आरक्षणाच्या बाजूने नाही. आजच्या आरक्षणाचं स्वरूप निव्वळ "मागासांना प्रतिनिधित्व" हे नसुन "गरीबी हटाव" असं झाल्याची अनेक उदाहरणं देता येतील. कदाचित या मोर्च्याच्या निमित्ताने "समुद्र मंथन" होउन सर्वच समाजातील आर्थिक मागासांना समान संधी उपलब्ध झाली तर.....? विचार करा आणि विकृत शेरेबाजीपासुन स्वत:ला दूर ठेवा. @शैलेंद्र दिंडे २२.०९.२०१६

No comments:

Post a Comment