Monday, July 31, 2017

नोटबंदी आणि दंग्याची खाज

आज साप्ताहिक सुट्टीचा दिवस. बराच वेळ तु-नळी वरचे व्हिडीओ पाहण्यात खर्च केला. (घरी लाईव्ह टीव्ही माझ्या वाटणीला येत नाही हे वैश्विक दुःख) यामध्ये एका बाजूला थोर विचारवंत सर अरविंद जी, जागतिक कीर्तीचे नकलाकार श्रीयुत राज जी, जगदभगिनी सु श्री मायावती जी, तर दुसऱ्या बाजूला श्री बोकिल आणि इतर किरकोळ नोटबंदी समर्थक यांचे विचार ऐकले. तर मुद्दा असा की मोदींनी नोटबंदी जाहीर केली ती का केली? पुरेशी तयारी का नाही केली? काळ्या पैशेवाल्यांवर थेट धाडी न घालता सामान्य कष्टकऱ्याला रांगेला का लावलं? नोटांवर उर्जित भाय ची सही कशी आली? इथपासून ते रेड्डीच्या मुलीच्या लग्नासाठी ५०० करोडच्या नोटा कुणी बदलून दिल्या? अंबानीने आपला काळा पैसा "जिओ"त कसा जिरवला? वगैरे तोंडावर लॉजिकल वाटणारे (आणि काही खरेही) प्रश्न समोर आले. जनतेत किती खदखद आहे ह्या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव कदाचित वेगळा असेल. त्यामुळे हा विषय वादाच्या बाहेर ठेवूया. एक गोष्ट मात्र आहे की ज्यांच्या बुडाखाली खरोखर अंगार लागलाय तिथून बुडबुडे मात्र जोरात बाहेर पडतायत. लोकांची गैरसोय होतेय या निरीक्षणाशी मी १००% सहमत आहे. पण मी स्वतः सुद्धा एक क्षुल्लक सामान्य माणूस असल्याने आणि सुदैवाने अर्थतज्ञ नसल्याने तसेच व्हाट्सअपचे "युज्ड डायपर" टाईपचे मेसेज आल्यास फॉरवर्ड न करता आणि न हुंगता परस्पर विल्हेवाट लावायची सवय असल्याने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात येत नाही की दंगे का होतील? का भडकतील? मला एक कळत नाही की सर अरविंद जी, राज जी, मा. न्यायालय यांच्याएवढी अक्कल आपल्याला नाही म्हणून दुःख वाटून घेऊ कि अज्ञानात सुख मानून येणारा प्रत्येक दिवस अजून सुखाचा व्हावा म्हणून आशा करू?

No comments:

Post a Comment