खरंतर देशात आज असलेल्या बहुतांश संघटना निर्भेळ राहिलेल्या नाहीत. मग त्या धर्माच्या, जातीच्या नावाने स्थापन झालेल्या असोत किंवा सामाजिक कार्याच्या निमित्ताने. त्या त्या संघटनांचे संस्थापक एनकेनप्रकारे कोणत्यातरी राजकीय पक्षाशी जवळीक ठेऊन असणारे आहेत. एकदा तुमच्यातला जाती-धर्माचा जाज्वल्य अभिमान (?) चेतवला कि त्यांचं अर्धं काम झालेलं असतं. मग कोणताही प्रसंग - घटना घडली कि तुमचा धर्म - जात संकटात असल्याचा कांगावा करून ध्रुवीकरण करणं सोप्प होऊन जातं. उथळ, भडकाऊ, रिकामटेकड्या तरुणांची फौज हेच त्यांचं भांडवल. या तथाकथित संकटमोचन हनुमानरूपी संस्थापकांमुळे तुमच्या जात-धर्मावरचं संकट टळो न टळो, तुम्ही मात्र संकटात नक्की पडत असता. ज्या वयात आपलं करिअर करून आईवडिलांना समाधान द्यावं, स्वतःचं आयुष्य उज्वल करावं; त्या वयात डोकी फोडणे - फोडून घेणे आणि अंगावर पोलीस केस घेतल्यामुळे बरबाद झालेले तरुण गल्लोगल्ली दिसतात. त्यापासून काही शिकण्याऐवजी त्यांचाच कित्ता गिरवणारे नवतरुण पाहिले कि मेंढरांच्या कळपाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आरक्षण - संविधान धोक्यात आलंय म्हणून मोर्चे काढणाऱ्या नेत्यांनी आजवर कधीही उपलब्ध सोयी - सुविधा आपल्या समाजबांधवांपर्यंत पोहचवाव्या, त्यांना कायमचं आर्थिक, मानसिक मागासलेपणातून बाहेर काढावं म्हणून एखादी प्रबोधन करणारी कृती करताना माझ्यातरी पाहण्यात आलेलं नाही. त्यांना आरक्षण .. मग आम्हाला का नाही असं म्हणत मराठा आणि इतर तत्सम मोर्चेवाल्यानी आपण सत्ता उपभोगताना जनतेच्या जीवावर उभ्या केलेल्या शैक्षणिक आणि औद्योगिक साम्राज्यात आपल्या जातबांधवांना विशेष सवलती देऊन उभं राहण्याचं बळ दिलेलं सुद्धा ऐकिवात नाही. उलट मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली त्याच पोरांना नागवून धनदांडग्यांच्या ५०-५५% वाल्या नालायक पाल्याना जागा देऊन आपल्या तुंबड्या भरून पुन्हा शिक्षण सम्राट म्हणून नावाजलेले कैक दिसतील. देशाला पाकिस्तान-चीन पासून जेवढा धोका आहे तेवढाच तो बेकार आणि बिनडोकांची फौज हेच ज्यांचं भांडवल आहे अशा संस्था, पक्ष यापासून आहे. राजकारण शुद्ध करण्यासाठी अशा बांडगुळांची रसद तुटणं अत्यावश्यक आहे. @शैलेंद्र दिंडे २८/०३/२०१८
No comments:
Post a Comment